दीड तासात ताज लॅन्डस हॉटेलमध्ये काय घडलं?

वांद्रयाच्या ताज लॅन्डस हॉटेलमध्ये आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. जवळपास दीड तास राजकीय खलबत झाली. त्यानंतर तिन्ही नेते हॉटेलमधून बाहेर पडले. मनसे तीन जागांसाठी आग्रही आहे. दिल्लीत अमित शाह यांच्याबरोबर राज ठाकरेंची जी बैठक झाली, त्यात तीन जागांची मागणी करण्यात आली होती. आज दोन जागांवर चर्चा झाली.

यात एक दक्षिण मुंबईची जागा आहे. दुसरी जागा नाशिक, शिर्डीची आहे. महायुतीमध्ये आधीच तीन पक्ष आहेत. त्यात आता चौथा पक्ष मनसे सहभागी झाल्यास जागा वाटपाची समीकरण जुळवताना अडचणी येऊ शकतात. त्यात मनसेला महायुती कसं सहभागी करुन घेणार, याची उत्सुक्ता आहे.दक्षिण मुंबईच्या जागेसाठी बाळा नांदगावकरांच्या नावाची चर्चा आहे.

आजची बोलणी सकारात्मक झाली का? ते लवकरच समजेल. दिल्लीत अमित शाह यांच्या बरोबर राज ठाकरेंची जी चर्चा झाली, त्यात मनसेला महायुतीमध्ये सहभागी करुन घेण्याचा विषय राज्यातील महायुतीच्या नेत्यांकडे सोपवण्यात आलाय. मनसेच्या मागण्या काय आहेत ते ऐकून घ्या. सकारात्मक चर्चा करुन मनसेला महायुतीत सहभागी करुन घ्या असा सूचना दिल्लीकडून देण्यात आल्या आहेत. आजची चर्चा सकारात्मक झाली का? पूर्णत्वास गेली का? आता याची उत्सुक्ता आहे.राज ठाकरे ताज लॅन्डसच्या बैठकीनंतर आता शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक करणार आहेत.

त्यात ते दिल्लीत काय चर्चा झाली? राज्यातील महायुतीच्या नेत्यांसोबत काय ठरलय? त्याची माहिती देऊ शकतात. पुढच्या काही तासात महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. एकाबाजूला महाविकास आघाडीत वंचितच्या सहभागाची शक्यता मावळलेली असताना दुसऱ्याबाजूला मनसेच्या महायुतीमधील सहभागाबाबत सकारात्मक गोष्टी घडत आहेत.