सौंदत्तीहुन परतलेल्या गाड्यांचे इचलकरंजीत आगमन…

सौंदत्ती श्री रेणुका देवी यात्रेसाठी गेलेल्या बैलगाड्यांचे इचलकरंजी येथील पंचगंगा नदीतीरावर आगमन झाले असून या बैलगाड्या व भक्तांचे उत्साहात पुजन आणि स्वागत करण्यात आले. सौंदत्तीहून गाड्यांचे आगमन झाल्यानंतर परंपरेनुसार येथील पंचगंगा नदीतीरावर श्री रेणुका देवीची यात्रा सोमवारपासून सुरु झाली आहे. तीर्थक्षेत्र सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या यात्रेसाठी इचलकरंजी शहरातून अनेक वर्षांपासून भक्तगण बैलगाड्यांसह विविध वाहनातून रवाना झाले होते. मागील आठवड्यात श्री रेणुका देवीची यात्रा झाल्यानंतर गाड्या परतीच्या मार्गावर निघाल्या होत्या.

रविवारी सायंकाळी या बैलगाड्यांचे परंपरेनुसार पंचगंगा नदीतीरावर आगमन झाले आहे. सौंदत्तीहून गाड्या शहरात दाखल झाल्या की पंचगंगा चार दिवस श्री रेणुका देवीची यात्रा भरते. त्याची सुरुवात सोमवारपासून झाली आहे. शहराच्या वेशीवर गाड्या आल्यानंतर त्यांचे पुजन व स्वागत अजय जाधव, प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, पै.अमृतमामा भोसले, राजू बचाटे आदींच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी राहुल घाट, प्रमोद पोवार, तानाजी कोकितकर, सागर कम्मे, भारत बोगर्डे, शशिकांत नेजे, प्रकाश वायचळ, नरसिंह पारीख, नितिन पडीयार, अनिस म्हालदार, विष्णू कम्मे, प्रेम तोरणे यांच्यासह रेणुका भक्त व नागरिक उपस्थित होते.