हुपरी शहरात अशुध्द व बनावट चांदी विकणारी टोळी सक्रीय

हुपरी शहरातील अशुद्ध चांदीचे बनावट पाटला प्रकरण चांगलेच गाजत असून अनेक व्यापाऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही लोक चौकशीच्या दडपणाखाली तोंड दाबून मुक्क्याचा मार सहन करत आहेत. या प्रकरणी अजित सुतार यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांकडे दोषींवर कारवाईची कठोर मागणी केली आहे. राजारामपूरी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल आहे. मात्र चौकशीच्या फेऱ्यातून काय बाहेर येणार की यावर पडदा पडणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. 

कोल्हापूर सराफ असोसिएशनच्या वतीने कल्पेश ओसवाल यांनी तक्रार दाखल केली आहे. सांगली जिल्ह्यातील विटा या ठिकाणी बनावट चांदीचे पाटले देऊन तयार दागिने घेऊन फसवण्याचा डाव असफल झाल्याने सोशल मिडियावर यासंदर्भात टंचफॉर्म, पाटले व आरोपींचे फोटो झळकायला सुरुवात झाली. यामुळे या ठकसेनांचा प्रताप हळूहळू चव्हाट्यावर यायला लागला. कोल्हापूरच्या सराफ बाजारपेठेत फार मोठा गंडा घातला गेला. अशा प्रकारे बनावट कच्ची चांदी देऊन बदल्यात उच्च प्रतीचे दागिने घेऊन फसवण्याचा फंडा वापरला जात आहे. यातून फसगत झालेले व्यापारी हुपरी शहरात येऊन जाब विचारताच त्यांना धमकावून दमदाटी करून अरेरावीची भाषा करतात व फसगत झालेले लोक रिकाम्या हाताने परत जातात हे वास्तव आहे.

पोलीसांकडून न्याय मिळेल याची शाश्वती नसल्याने एका व्यापाऱ्यांने लाखोंच्या चांदीवर पाणी सोडले आहे. असे कित्येक या रफू चक्करमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये एक टोळी सक्रिय असून दररोज नवीन सावज शोधून फसगत करायची व आलेल्या दागिन्यांची वाटणी केली जाते यातून कित्येक व्यापाऱ्यांना अंदाजे पैशाच्या रुपात शंभर दीडशे कोटींचा गंडा घातला आहे. एवढे सगळे घडत असताना हे संबंधित विभागाच्या लक्षात येत नाही याचे आश्चर्य वाटत आहे. बनावट चांदीच्या विटा कुठे तयार होतात? याचा सुत्रधार कोण आहे. त्या कशा पद्धतीने बनविल्या जातात फसवून आणलेल्या मालाची विल्हेवाट कशी लावली जाते ?हा चोरीचा माल कोण विकत घेते याला पाठबळ कोण देत आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने सखोल चौकशी करावी अशी मागणी शिवसेना गटाचे तालुका प्रमुख अजित सुतार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.