आषाढी एकादशी समारोप झाल्यानंतर विठुरायाच्या दर्शनानंतर वारकऱ्यांचं भाविकांचं परतीचा प्रवास सुरू झाला आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे एसटी महामंडळाच्या खामगाव कडे येत असलेल्या पंढरपूर (Pandharpur) निघालेल्या बसला अपघात झाला. मात्र पांडुरंगाचीच कृपा आणि आम्ही बचावलो अशा प्रतिक्रिया अशा बोलक्या भावना वारकऱ्यांच्या आहे. मात्र या अपघातामुळे भाविकांनी आपला जीव मुठीत ठेवला होता. पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाने प्रसन्न झालेल्या मनांना परतीच्या प्रवासात एकाएकी मोठा हादरा बसला. आषाढी वारीहून भाविकांना घेऊन परतणाऱ्या एसटी बसला आज सोमवार ७ जुलै पहाटे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहराजवळ अपघात झाला.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्ता दुभाजकाला धडकून उलटली, ज्यामुळे खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पांडुरंगाची कृपा आणि मोठा अनर्थ टळला. विठुरायाच्या दर्शनानंतर निघालेले हे सर्व भाविक आषाढीला पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर आपल्या घराकडे निघाले होते. एक मोठा अनर्थ एसटी बसचा अपघाताचा टळल्याने आम्ही त्यांच्याच कृपेने बचावलो अशी त्यांची भावना दिसून आली.
खामगाव आगाराची एसटी बस क्र. MH ४० Y ५८३० पंढरपूरहून ५२ भाविकांना घेऊन परतीच्या मार्गावर होती. पहाटे सुमारे पावणेदोनच्या सुमारास, चिखली शहरातील महाबीज प्रक्रिया केंद्रासमोर चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे वेगात असलेली बस थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला धडकली आणि पलटी झाली. रात्रीची वेळ असल्याने आणि बहुतांश प्रवासी झोपेत असल्याने बसमध्ये मोठा गोंधळ उडाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने चिखली आणि बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी झालेल्या १५ प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती समोर आली आहे.
