टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (२९ जून) बार्बाडोसला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झाला. या सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले.
यापूर्वी भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वात खेळताना २००७ साली पहिल्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी भारताने दुसऱ्यांदा या विजेतेपदाला गवसणी घातली आहे.
दरम्यान, टी२० वर्ल्ड कप दुसऱ्यांदा जिंकणारा भारत तिसरा संघ ठरला. यापूर्वी असा कारनामा वेस्ट इंडीज आणि इंग्लंडने केला आहे. वेस्ट इंडीजने २०१२ आणि २०१६ साली टी२० वर्ल्ड कप जिंकला. तसेच इंग्लंडने २००९ आणि २०२२ मध्ये टी२० वर्ल्ड कपला गवसणी घातली होती.