राज्यात मतदानाची निराशाजनक टक्केवारी!

पाचव्या टप्प्यातील आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 49 लोकसभा मतदारसंघात मतदानाचा घटता कल कायम राहिला आहे. महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्याचं मतदान पूर्ण झालं. मात्र या टप्प्यात 13 मतदारसंघातली मतदानाची टक्केवारी अतिशय निराशाजनक राहिलीय. राज्यात सरासरी 54.33 टक्के मतदान झालंय. तर देशात 60.09 टक्के मतदान झाले आहे. सर्वात जास्त मतदान पश्चिम बंगालमध्ये 76.05 तर महाराष्ट्रात सर्वात कमी 54.33 टक्के झाली आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदान दिंडोरी लोकसभा मतदारसंघात झालं तर सर्वात कमी मतदान कल्याण लोकसभा मतदारसंघात झालं. दिंडोरीत 62.65 टक्के मतदान झालं. दिवसभर असलेली उष्णता, मतदार याद्यातले घोळ यामुळे मतदानाचा टक्का घसरल्याचं बोललं जातंय. विविध पक्षांकडून आणि नेत्यांकडून वारंवार आवाहन करूनही प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत मतदाराला आणण्यात अपयशच आणल्याचं दिसलं.