सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सहा तालुक्यांतील ३७ गावांत ४२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. माळशिरस, करमाळा, सांगोला तालुक्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ज्या गावात पाणीटंचाई भासत आहे, त्याठिकाणी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. असे असतानाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर हे पाणी, चारा टंचाईसंदर्भात नियोजन करीत आहेत. शासनाने जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस, सांगोला या तीन तालुक्यांत गंभीर, तर करमाळा व माढा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.