मासेमारी व्यवसाय धोक्यात, मच्छिमारांच्या विरोधानंतरही राज्य सरकार सागरी सेतूवर ठाम ?

प्रस्तावित उत्तन-विरार सागरी सेतू रद्द करत, त्याऐवजी दहिसर-भाईंदर लिंक रोडचा विरारपर्यंत विस्तार करण्याची मागणी केली जात आहे. सागरी सेतूमुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात येणार असल्याने, त्याला मच्छिमारांकडून विरोध दर्शवला जात आहे. यातच आता सागरी सेतूसाठी सर्वेक्षण हाती घेण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’कडून घेण्यात आला आहे. विरोधानंतरही सागरी सेतू उभारण्यावर राज्य सरकार ठाम असल्याचे समोर आले आहे.

पालघर जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला कमी वेळेत पोहोचता यावे, यासाठी पहिल्या टप्प्यात उत्तन-विरार आणि दुसऱ्या टप्प्यात विरार-पालघर असा सागरी सेतू ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी येणाऱ्या ८७ हजार ४२७ कोटींच्या खर्चास मंजुरीही देण्यात आली आहे. या मार्गासाठी समुद्र किनारपट्टीपासून सुमारे एक किमी आत पूल उभारला जाणार आहे.

परिणामी मासेमारी व्यवसाय धोक्यात येणार असून, समुद्र किनारपट्टीवरील उत्तनसह पालघर जिल्ह्यातील अनेक गावांतील मच्छिमारांवर बेरोजगारीची वेळ येण्याची भीती वर्तवली जात आहे. म्हणून, सेतू जाणाऱ्या लगतच्या गावातील मच्छिमारांकडून त्याला विरोध दर्शवला जात आहे. तसेच हा प्रकल्प रद्द करत, वर्सोव्यापासून दहिसरपर्यंत व पुढे भाईंदरपर्यंत येणाऱ्या लिंक रोडचा विरारपर्यंत विस्तार करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची उन्नतमधील मच्छिमारांची काही दिवसांपूर्वी भेटही घेतली होती.

त्यानंतर त्यांनी मच्छिमारांच्या मागणीनुसार, मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यांना सागरी सेतू प्रकल्प रद्द करत, लिंक रोडचा विस्तार करण्याची विनंती केली होती. यासह राज्य सरकारलाही पत्राद्वारे मच्छिमारांकडून कळवण्यात आले आहे.

मात्र, त्यानंतरही आता प्रकल्पाचा सामाजिक प्रभाव मूल्यांकन अभ्यासासाठी सर्वेक्षणाचा निर्णय ‘एमएमआरडीए’कडून घेण्यात आला आहे. जूनपासून पुढील तीन महिने हे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेला आवश्यक सहकार्य करण्याची विनंती ‘एमएमआरडीए’ कडून मिरा-भाईंदर महापालिका आणि पालघर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

सागरी पुलामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात येणार असल्याचे मच्छिमारांचे मत आहे. त्याच अनुषंगाने माहिती घेण्यासाठी सर्वेक्षणाचा निर्णय आता घेण्यात आला आहे. या सर्वेक्षणात समोर येणाऱ्या बाबींचा विचार करूनच सागरी सेतू उभारण्या संदर्भातील पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री, प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

उत्तन-विरार सागरी सेतू हा उत्तन, वसई आणि विरार अशा तीन रस्त्यांनी जोडला जाणार आहे. उत्तनमधील जोडरस्ता सुमारे साडेनऊ किमी लांबीचा, तर सहा पदरी रुंद असणार आहे. उत्तन किनाऱ्याला लागून शेकडो मच्छिमारांची घरे आहेत. ही बाब लक्षात घेता, सागरी सेतूच्या कामात अनेक मच्छिमारांची घरेदेखील बाधित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सागरी सेतू उध्वस्त करणारा ठरणार असल्याचे मत मच्छिमारांकडून व्यक्त केले जात आहे.