कोल्हापूर-सांगली महामार्गाचं चौपदरीकरण अद्याप अपूर्णच…

सांगली जिल्ह्याच्या विकासाचे दोन मार्ग गेल्या दशकभरापेक्षा अधिक काळ रखडले आहेत.त्यापैकी पेठ-सांगली या महामार्गाचे काम सुरू झाले आहे. मात्र, कोल्हापूर-सांगली महामार्ग अद्याप लटकलेलाच आहे. भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी ‘दिल्ली अभी बहोत दूर है’ असेच म्हणण्यासारखी स्थिती आहे.सुरवातीला ‘बांधा, वापरा आणि हस्तांतर करा’, या बीओटी तत्त्वावर सांगली-कोल्हापूर रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे काम सुरू होते.

मात्र, ते बराच काळ रखडले. सरकारे बदलली; पण या रस्त्यांची स्थिती काही बदलत नव्हती. चौपदरीकरणाचे स्वप्न आणि प्रत्यक्षात खड्डेयुक्त खराब रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागत होता. दुसऱ्या बाजूला सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या मार्गाचीही हीच स्थिती होती. तरी तेथे काम सुरू होते. २०२२ मध्ये केंद्रीय दळणवळण व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (यांनी सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाचे लोकार्पणही केले; पण शिरोली ते अंकली या मार्गाला काही मुहूर्त लागत नव्हता.