नवरात्रोत्सवाच्या सुरवातीला साडेतीन शक्तीपीठांसह घरोघरी घटस्थापना, भाविकांमध्ये उत्साह

आजपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2023) सुरूवात झाली आहे. दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील शक्तीपीठ असलेल्या देवीच्या मंदिरात तसेच घरोघरी घटस्थापना केली जाते आणि या नऊ दिवसांमध्ये भाविकांची या मंदिरात गर्दी दिसून येते. आपल्या देशात देवींना सर्वोच्च स्थान आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ असलेल्या देवींच्या मंदिरांसोबतच इतर महत्त्वाच्या मंदिराबाबत जाणून घ्या, या ठिकाणी नवरात्री साजरी करण्यात येत आहे. 

सप्तशृंगी देवी मंदिर (अर्ध पीठ)
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धशक्तीपीठातील सप्तशृंगी देवी नाशिकपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर 4800 फूट उंच सप्तशृंगी पर्वतावर विराजमान आहे. सह्याद्रीच्या सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगा पर्वत, जिथे एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगरावर निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य, जणू देवी आपल्याला निसर्गाची ओळख करून देते असे वाटते. साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य शक्तीपिठ असलेल्या नाशिकच्या वणी येथील सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असतो. आज सकाळी 7 वाजता मंदिर संस्थानच्या कार्यालयात देवीच्या आभूषणांच्या महापूजा करण्यात आली आहे, संस्थानचे अध्यक्ष बी, व्ही. वाघ यांच्या हस्ते सपत्निक ही पूजा पार पडली. महापूजेनंतर महाआरती करण्यात येते. संस्थानच्या कार्यालयापासून ते मंदिरापर्यंत देवीच्या आभूषणांची वाजत गाजत मिरवणूक देखील काढण्यात येते.

रेणुका देवी मंदिर, (पूर्ण पीठ)
महाराष्ट्रातील माहूर प्रदेश रेणुका देवी मंदिरासाठी विशेष प्रसिद्ध आहे. श्री रेणुका मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवास आज घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. घटस्थापने पूर्वी श्री रेणुका देवीचे मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. सकाळी साडेअकरा वाजता श्री रेणुका देवी संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी हे एक शक्तिपीठ आहे. मांढरदेवी काळूबाई मंदिराची स्थापना सातारा जिल्ह्यातील वाई भागात डोंगराच्या 4650 फूट उंचीवर आहे. हिंदू धर्मातील हे अतिशय प्रसिद्ध मंदिर असून दरवर्षी जानेवारी महिन्यात काळूबाई जत्रा, यात्रा भरते. 

तुळजा भवानी मंदिर,(पूर्ण पीठ)
सोलापूरपासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर असलेले तुळजा भवानी मंदिर महत्त्वाच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. सह्याद्री नदीवर वसलेल्या यमुनाचल पर्वताच्या कुशीत हे मंदिर आहे.

महालक्ष्मी मंदिर (पूर्ण पीठ)
महालक्ष्मी मंदिर हे 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ते महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे आहे. कोल्हापूरच्या या महालक्ष्मी देवीच्या मंदिराला दक्षिणेची काशी असेही म्हणतात. या मंदिरात नवग्रह, भगवान सूर्य, महिषासुरमर्दिनी, विठ्ठल रखमाई, शिवाजी, विष्णू, तुळजा भवानी इत्यादी देवतांचीही पूजा केली जाते.