मि.परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणाऱ्या अभिनेता आमिर खानने 1973 साली ‘यादों की बारात’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर, डायरेक्ट अभिनयात न घुसता आधी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. अखेर 1988 मध्ये ‘कयाम से कयामत तक’ या चित्रपटातून त्याने मुख्य भूमिकेत पदार्पण केले आणि नंतरचा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. गेल्या अनेक दशकांपासून मोठ्या पडद्यावर राज्य करणारा आमिर तरूणींच्या गळ्यीतल ताईत होता, यशाची अनेक शिखरे त्याने गाठली. मात्र त्याच आमरिला काही गोष्टींचा पश्चातापही वाटतो. चित्रपटाच्या जगात मी इतका मश्गुल झालो होतो की माझ्या फॅमिलीकडे लक्षच देऊ शकलो नाही, असं त्याने प्रांजळपणे कबूल केलं.
सध्या आमिर त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 20 जूनला तो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याच प्रमोशनदरम्यान त्याने राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये दिलखुलास गप्पा मारल्या, त्याच्या कुटुंबाबद्दलही तो बोलला. आमिर म्हणाला, “तो कोविडचा काळ होता. तोपर्यंत ‘लाल सिंग चड्ढा’ अर्धवट तयार झाला होता. जेव्हा कोविड आला तेव्हा चित्रपटाचे काम थांबले.”
आमिरला होता चित्रपटाचा नशा
तो पुढे म्हणाला, “जेव्हा काम थांबले तेव्हा मला विचार करण्यासाठी खूप वेळ मिळाला. वयाच्या 18 व्या वर्षी मी सहाय्यक दिग्दर्शक झालो तेव्हापासून कोविडपर्यंत (जवळजवळ 37 वर्षे), मी त्या वेडेपणात, नशेत, सिनेमाच्या प्रेमात इतका हरवून गेलो होतो की मी माझ्या आयुष्याकडे मागे वळून पाहण्यासाठी आणि माझ्या आयुष्यात काय घडत आहे ते पाहण्यासाठी कधीच थांबलो नाही. कारण सिनेमा खूप व्यसन लावणारा आहे आणि मला तर ते व्यसन खूपच लागलं” असं आमिरने कबूल केलं..
“जेव्हा मी विचार करायला सुरुवात केली तेव्हा मला जाणवलं, की मी माझ्या मुलांना वेळ दिलेला नाही. मी माझ्या आईसोबत जास्त वेळ घालवलेला नाही. रीना, किरण, माझे भाऊ आणि बहिणी, जे माझ्या खूप जवळचे आहेत. कदाचित मी त्यांच्यावर खूप मोठा अन्याय केलाय. मी आंधळा झालो होतो,” असं आमिर म्हणाला. मला जेव्हा या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा मला खूप अपराधी वाटत होतं आणि माझ्याकडून जणू खूप मोठी चूक झालीये, असं वाटू लागल्याचं आमिरने नमूद केलं. त्यानंतर आमिरने चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला. मी चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला, असं आमिर म्हणाला.
जेव्हा मी असं म्हणतो, तेव्हा अनेकांना वाटतं की मी एक कठोर बाप आहे, पण असं नाहीये, असंही आमिरने सांगितलं. इतर लोकांच्या तुलनेत मी चांगला पिता आहे, असं तो म्हणाला. आमिरने त्याच्या कुटुंबालाही सिनेमा सोडण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं. त्यानंतर, आमिरने लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला फोन केला आणि आता मी चित्रपटाच्या प्रत्येक विभागात सहभागी होणार नाही, तर फक्त अभिनेता आणि निर्माता म्हणून काम करेने, असं सांगितलं. मी ‘लाल सिंग चड्ढा’ पूर्ण करून प्रदर्शित करेन आणि त्यानंतर दुसरा कोणताही चित्रपट करणार नाही असंही त्याने दिग्दर्शकाला सांगितलं.
‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकालाही , आर.एस प्रसन्ना यांनाही आमिरने हेच सांगण्यासाठी त्याच्या घरी बोलावले होते. ते घरी येण्याच्या एक दिवस आधीच, आमिरला त्याच्या मुलांनी समजावून सांगितलं होतं की िवृत्तीचा त्याचा निर्णय चुकीचा होता. मुलांनी त्याला खूप समजावून सांगितल्यानंतर आमिरने होकार दिला.