ईश्वरपुरात सराफी दुकानात चोरी; रोकड, चांदी लंपास

ईश्वरपूर येथील गांधी चौक परिसरातील श्वेता ज्वेलर्स या सराफी दुकानात गुरुवारी मध्यरात्री चोरीची घटना घडल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून रोख रक्कम व चांदीचे दागिने लंपास केले.

याबाबत माहिती अशी की, दुकानमालक शंकरराव बाबुराव कदम (रा. ईश्वरपूर, ता. वाळवा) यांचे गांधी चौकात श्वेता ज्वेलर्स या नावाने सराफी दुकान आहे. गुरुवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला व गल्ल्यातील सुमारे 25 हजार रुपये रोख रक्कम तसेच चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना सकाळी दुकान उघडताना निदर्शनास आली.

घटनेची माहिती मिळताच व्यापारी व नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. सदर प्रकारामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. उरूण-ईश्वरपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहन पाटील यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्याकडे निवेदन देऊन, घटनेचा सखोल तपास करून आरोपींना तत्काळ अटक करावी तसेच व्यापाऱ्यांना रात्रीच्या वेळी पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.