“कमी कालावधीची पिकं मूग, उडीद, तुर, सोयाबीन यांची लवकर पेरणी करावी. शक्यतो कमी कालावधीची पिकांची लागवड ही कोरडवाहू जमिनीतच करावी जेणेकरून त्यांना अतिरिक्त पावसाचा फटका बसणार नाही. माती परीक्षण केल्यानंतर खताची मात्रा विभागून द्यायला हवी त्यामूळे जमीनीचा पोत टिकून राहतो,” ते पुढे सांगतात.
पिकांची लागवड कशी करावी?
कपाशीसाठी लागवडीच्या वेळेस खताची मात्रा द्यावी. शिफारशीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा झिंक सल्फेट 8 ते 10 किलो, गंधक 2 किलो प्रति एकरात वापरावे, असं पवार सांगतात.
पुढे ते सविस्तर सांगतात, “सोयाबीन बियानाची उगवण क्षमता तपासूनच त्याची लागवड करावी. सोयाबीन पिकात खोड माशी, खोड किड्यांचा प्रभाव टाळण्यासाठी विटाव्हॅक्स 3 ग्रॅम प्रति किलोसाठी वापरावे. पेरणी करत असताना 2 ते 4 सेंटीमीटर अंतरावर वरच करावी जेणेकरून जास्त खोलात पेरणी झाल्यास त्याचा उगवण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. गरजेनुसार स्फुरद आणि पालाश एकरी 8 ते 10 किलोचा वापर केल्यास त्याचा उत्तम फायदा होतो.”
“तूर या पिकासाठी प्रतिबंधक वाणाची निवड करावी. घरच्या वाणाची निवड करू नये. तूर या पिकालासुध्दा 10 किलो प्रती एकर स्फुरद वापरावे. जास्त पाणी झाल्यास निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या जेणेकरून तुरीवर मर येणार नाही,” अशी माहिती डॉ. सूर्यकांत पवार देतात.
‘पिकानुसार जमीनीची निवड करावी’
डॉ. रवी आंधळे, सहयोगी प्राध्यापक, ग्रामीण कृषी हवामान सल्ला सेवा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या मते, “पेरणी करताना शेतकऱ्यांनी पिकानुसार जमीनीची निवड करावी.”
ते सांगतात, “राज्यात मान्सून पूर्व पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये. पिकानुसार जमीनीची निवड करावी . पण 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पिक पेरणी करून आर्थिक नुकसान ओढवून घेऊ नये. कृषी विद्यापीठांनी वेळोवेळी केलेल्या शिफारशींचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा.”
