मुंब्रा दुर्घटनेतील प्रवाशांच्या मृत्यूंवर रेल्वे अधिकाऱ्यांचे मौन, पण अपघातानंतर भाष्यच नाही

आठवड्याच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेच्या उपनगरी रेल्वे विभागातील मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान धावत्या रेल्वेतून पडून चार प्रवाशांचा मृत्यू(deaths) झाल्याची घटना घडली. मुंबईला हादरवणाऱ्या या घटनेमुळे सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मध्य रेल्वे महाव्यवस्थापक (जीएम) धरमवीर मीना, मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) हिरेश मीना यांनी या घटनेबाबत चिडीचूप राहण्याची भूमिका स्वीकारली. भेटण्यासह समाजमाध्यमांवर या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे.

रेल्वेमंत्री, डीआरएम, जीएम यांच्याकडून भाष्यच नाही
भारतीय रेल्वेवरील मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे असे दोन रेल्वे झोन मुंबईत आहेत. पश्चिम रेल्वेकडून चर्चगेट ते विरार – डहाणू रोड दरम्यान लोकल फेऱ्या चालवल्या जातात. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा/कर्जत आणि सीएसएमटी ते पनवेल/वाशी/गोरेगाव, खारकोपर-उरण या मार्गावरील लोकलचे व्यवस्थापन मध्य रेल्वेकडून होते. मुंबई विभागात या लोकल फेऱ्या चालवण्यात येतात.

मुंबई विभागासाठी पर्यायाने मुंबई लोकलमधील प्रवाशांना सुरक्षित प्रवास घडवण्यासाठी आवश्यक ते प्रकल्प मार्गी लावण्याचे बहुतांश अधिकार डीआरएम हिरेश मीना यांना आहेत. मात्र इतक्या मोठ्या मुंब्रा दुर्घटनेत धावत्या लोकलमधून प्रवासी पडलेल्या घटनेवर रेल्वेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. त्यांनी माध्यम प्रतिनिधींनाही भेटायला नकार दिला. मध्य रेल्वे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याआधी मात्र रेल्वे संबंधितांकडून वेळोवेळी विविध ट्विट्स, रिपोस्ट करण्यात आल्या. मात्र मुंब्रा दुर्घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.