विधिमंडळ राडा प्रकरणात मोठी अपडेट; जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान गुरुवारी विधानभवनात मोठा राडा झाला. भाजप आमदार गोपीचंद आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीनंतर पोलिसांनी आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना ताब्यात घेतल्यानंतर आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. जोपर्यंत देशमुख यांना सोडणार नाही, तोपर्यंत गाडीसमोरून हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आलेली असताना विधिमंडळातही याप्रकरणी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांवर कारवाईसंबंधीचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे. कारण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी अहवाल मागवून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

गेले काही दिवस आमदार पडळकर आणि आमदार आव्हाड यांच्यात विधानमंडळ परिसरात खटके उडत होते. दोन दिवसांपूर्वी आमदार पडळकर माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी आमदार आव्हाड यांनी त्यांच्यावर शेरेबाजी केली. त्यामुळे वातावरण अधिकच तापले. गुरुवारी दोन्ही नेते आणि त्यांचे समर्थक एकमेकांच्या समोर आले. जोरदार घोषणाबाजी झाली आणि बघता बघता मारामारी सुरू झाली. या घटनेनंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. “आम्ही अहवाल मागवला आहे आणि योग्य ती कारवाई करू,” असे ते म्हणाले.