मुंबईत मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरलेला असून पुढील तीन ते चार तास मुंबईच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही दिवसाच्या विश्रांतीनंतर मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुज,वांद्रे या सर्व परिसरामध्ये सध्या आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे.पश्चिम उपनगरात पावसाच्या जोर कमी असल्यामुळे सखल भागांमध्ये अजून कुठेही पाणी भरलं नाही. मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दोन्ही मार्गावरील लोकल काही मिनिटे उशिराने धावत आहेत. रस्ते वाहतुकीवर अद्याप कोणताही परिणाम नाही.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सातारा सांगली, छत्रपती संभाजीनगर,नांदेड, परभणी, बीड, सोलापूर, जळगाव, गडचिरोली या भागात देखील आज पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात गेल्या अनेक दिवासांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने बहुतांश जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा, कोकणसह, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान कोकणासह मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर राहील. तर मराठवाड्यात 14 व 15 ऑगस्टला पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. तर तिकडे विदर्भात अमरावती,चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट नागपूर वेधशाळेने दिला आहे. शिवाय उर्वरित जिल्ह्यासाठी येलो अलर्ट आहे.
