वेगवेगळ्या मसल्याचे (Masala) पदार्थ आपण मोठ्या चवीने खातो. मात्र हेच मसाले आपल्यासाठी जीवघेणेदेखील ठरू शकतात. सध्या भारतातील मसाले निर्मिती करणाऱ्या दोन कंपन्यांच्या काही उत्पादनांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण हाँगकाँग आणि सिंगापूरच्या सरकारने यातील एका कंपनीच्या तीन आणि दुसऱ्या कंपनीच्या एका मसाल्याची विक्री थांबवली आहे.
तसेच तेथील नागरिकांसाठी या सरकारने काही सूचनादेखील जारी केल्या आहेत. हाँगकाँग आणि सिंगापूर सरकारच्या या निर्णयामागचं नेमकं कारण काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. हाँगकाँग आणि सिंगापूर सरकारने भारतातील मसाले निर्मिती करणाऱ्या दोन कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री थांबवण्यात आली आहे. लोकांनी हे मसाले वापरू नयेत, असं येथील सरकारने म्हटलंय. तेथील खाद्य संरक्षण मंडळाच्या म्हणण्यानुसार या दोनपैकी एका कंपनीच्या तीन आणि दुसऱ्या कंपनीच्या एका मसाल्यात इथिलीन ऑक्साइड नावाचा घटक प्रमाणापेक्षा अधिक आहे.
या घटकामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो. आयएनएएसच्या वृत्तानुसार हाँगकाँगचे खाद्य सुरक्षा मंडळ सेंटर फॉर फूड सेफ्टीच्या (सीएफएस) म्हणण्यानुसार करी पावडर, सांबर मसाला आणि करी पावडर, मिक्स मसाला पावडर, फिश करी मसाले यांची विक्री थांबवण्यात आली आहे. या मसाल्यांत कीटनाशक, इथिलीन ऑक्साइड आढळले आहे.