इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांवर टीकेची तोफ!

इचलकरंजी शहराला पिण्याचे स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्यासाठी सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात तज्ञांची समिती नेमून एक महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ मार्च रोजी मुंबई येथील बैठकीत दिले होते. त्याचबरोबर बैठकीत चर्चेदरम्यान उपस्थित अन्य पर्यायामधून पाणी इचलकरंजीला देता येईल काय? याबाबत देखील या समितीने अभ्यास करावा, असे सांगत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा कोणताही अडथळा याच्या कार्यवाहीसाठी येणार नाही असा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला होता.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकनंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशन काळात विधानभवनात घेतलेल्या बैठकीत एक महिन्याच्या आत इचलकरंजीच्या दूधगंगा नळ पाणी योजनेचा अहवाल मागवून पाणीप्रश्न निकाली लावण्याचे आश्वासन दिले होते.मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा करून अहवाल मागविण्यात चालढकल करत आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी समाजवादी प्रबोधनी येथील बैठकीत केली.