वाळव्यात दूषित पाणीपुरवठा! नागरिकांचे आरोग्य धोक्यात

वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे गेले आठवडाभर दूषित पाणीपुरवठा होत असून, लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यात सुधारणा न झाल्यास पाटबंधारे खात्याच्या कार्यालयास टाळे ठोकणार असल्याचा इशारा सरपंच संजय पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाची प्रत वाळवा तहसीलदार यांना दिली आहे. गेले आठवडाभर गावात हिरव्या रंगाचे गढूळ दूषित पाणी येत आहे. यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढत आहेत. पाणीपुरवठ्यात सुधारणा न झाल्यास पाटबंधारे विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा दिला आहे. याबाबत ग्रामपंचायतीस काहीही फरक पडत नसून लोकांचे जीवित धोक्यात आले आहेत. शुद्ध पाणी देणे जबाबदारी असताना त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. नागरिक संतप्त आहेत. यावेळी उपसरपंच मनीषा माने, ग्रामपंचायत सदस्य अनिल साळुंखे, शरद बल्लाळ, किरण पाटील मनोज वडार उपस्थित होते.