e-KYC न केलेल्यांचे रेशनधान्य ‘या’ तारखेपासून बंद होणार

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब गरजूंना अत्यंत कमी दरात रेशनधान्याचा पुरवठा होतो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता सरकारने ई-केवायसी (e-KYC) करण्याची अट घातली आहे.योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ‘ई-केवायसी’तून लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असून ‘ई-केवायसी’ (e-KYC) न केलेल्यांचे रेशनधान्य १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. २३ सप्टेंबरच्या रिपोर्टनुसार राज्यातील चार कोटी सदस्यांसह सोलापूर जिल्ह्यातील रेशनकार्डवरील १६ लाख ३२ हजार ७८५ जणांनी ‘ई-केवायसी’ केलेली नाही.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील धान्य मिळविण्यासाठी सर्व रेशनकार्डधारकांना ‘ई-केवायसी’चे बंधन घालण्यात आले आहे. अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. मात्र, तरीदेखील अनेक शिधापत्रिकाधारकांली ‘ई-केवायसी'(e-KYC) ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांचे रेशन १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. तत्पूर्वी, ‘ई-केवायसी’ करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

जर शिधापत्रिकाधारकाने ३१ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना रेशनचे धान्य मिळणार नाही. याशिवाय अशा शिधापत्रिकाधारकांची नावेही रेशनकार्डमधून वगळली जाणार असून त्या शिधापत्रिका देखील रद्द केल्या जाणार आहेत. आता पुढील ३६ दिवसांत राज्यातील चार कोटी तर जिल्ह्यातील २० लाख व्यक्तींची ‘ई-केवायसी’ करून घ्यावी लागणार आहे.