गव्हासह पीठाच्या वाढत्या दराला लागणार ब्रेक, गृहिणींना मिळणार ‘भारत आटा’

सततच्या महागाईने सामान्य जनता होरपळून निघत आहे. अनेक दरात वाढ झाल्याने आर्थिक टंचाईचा सामना हा करावा लागत आहे. सर्वसामान्यांना महागाईचा चटका सोसावा लागत आहे. या महिन्यात गॅस सिलिंडरच्या भावासह डाळीच्या किमतीचे भाव वाढले. अशातच गव्हाच्या किंमतीमध्ये देखील वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

गव्हासह (Wheat) त्याच्या पिठाचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गहू आणि गव्हाचे पीठ योग्य दरात उपलब्ध व्हावे यासाठी केंद्रीय भांडार, नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनसीसीएफ)ने गहू खरेदी करुन त्याचे पीठ प्रति किलो २७.५० रुपये इतक्या किरकोळ दरापर्यंत विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्वसामान्यांना ‘भारत (India) आटा’ ब्रँड अंतर्गत विक्रीस येईल. केंद्रीय भांडार, नाफेड, एनसीसीएफ आणि राज्य सरकारांच्या सहकारी संस्थांद्वारे प्रत्यक्ष अथवा फिरत्या विक्री केंद्रांवर ‘भारत आटा’ उपलब्ध होणार आहे.  

यामध्ये २.५ लाख मेट्रिक टन गहू, प्रति किलो २१.५० रुपये दराने वितरित करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना योग्य दरात गहू उपलब्ध व्हावे यामागचे हे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच सरकारच्या मार्फत भारत आटा हा २७.५० रुपये किलो पेक्षा जास्त रुपयात(Price) विकता येणार नाही. तसेच याची विक्री किरकोळ किमतींपेक्षा कमी असेल.

केंद्र सरकारच्या गोदामात 16 नोव्हेंबर 2023 पर्यंत 209.85 लाख मेट्रिक टन इतका गव्हाचा साठा होता. भारत सरकार केंद्रीय/राज्य सहकारी संस्थांच्या देशभरातली प्रत्यक्ष/फिरत्या किरकोळ विक्री केंद्रांच्या माध्यमातून, प्रक्रिया करण्याकरता आणि पीठ बनवून विक्री करण्याकरिता गहू उपलब्ध करणार आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी यांनी निरंजन ज्योती यांनी लोकसभेत माहिती दिली.