जत विधानसभा मतदारसंघातुन भाजपकडून आमदार झालेल्या आणि आटपाडी तालुक्यातील सुपूत्र असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांची आटपाडीत भव्य मिरवणूक आणि सत्कार सन्मान सोहळा पार पडला. मला मंत्रिपद मिळाले नाही म्हणुन कार्यकर्त्यांनी बारीक तोंड करू नका, आता आपल्या वाटयाचा संघर्ष संपलाय, आपला माणूस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिलेत.
आपण मंत्री नाही पण आपला मंत्र्यापेशा रुबाब कमी नाही, मंत्र्यासारखाचा माझा रुबाब आहे. काहीजण मला मंत्रिपद भेटले नाही म्हणून खुश झाले. पण आता आपण बाळूमामा झालोय, शांत संयमी राहायचे असेही पडळकर म्हणाले. मी मागच्या दाराने विधानपरिषदेत गेलोय असे विरोधक टीका करत होते. आता पुढच्या दाराला लाथ मारून जतच्या जनतेने मला विधानसभेत पाठवलेय, असेही पडळकरांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी श्रीकृष्णसारखे आहेत. संपूर्ण टेंभू योजनेला क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचे नाव द्या अशी मागणीही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.