‘संतोष देशमुखांची शेवटची इच्छाही मारेकऱ्यांनी पूर्ण केली नाही’

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पोलिस तपासातून विविध खुलासे केले जातायत. अलीकडेच सोशल मीडियावर संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संताप उफाळून आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडशी संबंध असल्याच्या कारणामुळे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडेंना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आहे.

या सगळ्या घडामोडीनंतर आता संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख यांना ज्यावेळी मारहाण केली जात होती. त्यावेळी संतोष देशमुख मारेकऱ्यांकडे विनवणी करत होते. ते शेवटची इच्छा व्यक्त करत होते. मात्र मारेकरी त्यांना निर्दयीपणे मारत राहिले, याबाबतचा खुलासा संतोष देशमुखांची कन्या वैभवी हिने केला आहे. माझे हातपाय तोडा पण मला गावासाठी – मुलांसाठी जगू द्या, अशी इच्छा माझे वडील व्यक्त करत होते. मात्र त्यांनी माझ्या वडिलांना मारलं, अशी प्रतिक्रिया वैभवीने दिली.

माझ्या वडिलांची हत्या खंडणी प्रकरणातूनच झाली. पण या लोकांना खंडणी मागायला कुणी पाठवलं? त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त होता. याची चौकशी करून त्यांनाही सहआरोपी करावं. माझ्या बाबांना बेदम मारहाण करण्यात आली. ते माझे हातपाय तोडा, पण गाव आणि मुलांसाठी मला जगू द्या, अशी शेवटची इच्छा व्यक्त करत होते. पण त्यांनी कसलीही दयामया दाखवली नाही. ते निर्दयीपणे मारहाण करत राहिले, अशी भावनिक प्रतिक्रिया वैभवीनं दिली आहे.

बीडमध्ये 9 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुलेसह त्याच्या काही साथीदारांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केलं होतं. यानंतर आरोपींनी अमानुषपणे मारहाण करत संतोष देशमुखांचा जीव घेतला होता. याबाबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये नराधम आरोपी निर्दयीपणे देशमुखांना मारहाण करताना दिसत आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर नैतिकेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे