कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा १४ धावांनी पराभव करून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. मंगळवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून २०४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्ली संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १९० धावा करू शकला. दिल्लीकडून फाफ डू प्लेसिसने ४५ चेंडूत ६२ धावा केल्या.शाप्रकारे, केकेआर संघाने दिल्लीला त्याच्या घरच्या मैदानावर हरवले. सामन्यातील विजयानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे काय म्हणाला ते जाणून घेऊया.
अक्षरने ४३ धावांची खेळी केली, पण दोन्ही डाव दिल्लीला सामना जिंकण्यास मदत करू शकले नाहीत. एका क्षणासाठी दिल्लीचा संघ विजयाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत होते, परंतु केकेआरचा फिरकी गोलंदाज सुनील नारायणने दोन विकेट घेत दिल्लीला बॅकफूटवर आणले. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये सांगितले की, “या टप्प्यावर आम्हाला विजयाची नितांत आवश्यकता आहे. १३ षटकांनंतर जेव्हा सुनील गोलंदाजी करायला आला तेव्हा त्यांनी नियमित अंतराने विकेट गमावल्या आणि मला वाटते की तोच सामना बदलणारा क्षण होता.”
“आम्हाला अजूनही काही धावा कमी होत्या, वरुण, अनुकुल आणि रसेल यांनीही सुनीलला चांगली साथ दिली. आम्हाला वर्तमानात राहायचे आहे आणि एका वेळी एकाच सामन्यावर लक्षकेंद्रित करायचे आहे. सुनील या फ्रँचायझीसाठी एक चॅम्पियन खेळाडू आहे, जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा आम्ही सुनील आणि वरुणकडे वळतो. सुनील नेटमध्ये खूप सराव करतो. रसेल त्याच्या गोलंदाजीवर खूप मेहनत घेतो. आम्ही पॉवरप्लेनंतर एक षटक आणि १५ षटकांनंतर काही षटके टाकण्याची रणनीती स्वीकारतो. मी लवकरच बरा होईन.” रहाणे म्हणाला.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रहाणेला (Rahane) दुखापत झाली होती. दुसऱ्या डावातील १२ व्या षटकात शॉर्ट कव्हरवर क्षेत्ररक्षण करताना फाफच्या चेंडूने रहाणेला फटका बसल्याने त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला आणि पुन्हा सामना खेळायला आलाच नाही. त्याच्या अनुपस्थितीत सुनील नारायणने कर्णधारपद भूषवले. कोलकात्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेने 10 सामन्यांतील चौथ्या विजयानंतर सांगितले की, “सुनील नारायण हा फ्रँचायझीसाठी एक चॅम्पियन गोलंदाज आहे. तो खूप मेहनत घेत आहे, सराव सत्रांसाठी लवकर येत आहे. तो नेटमध्ये तासंतास गोलंदाजी करत आहे.”