भारत – पाकिस्तान तणावादरम्यान ७ मे रोजी मॉक ड्रिलची घोषणा

जम्मू – काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर हल्ला करण्यात आला. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या भ्याड हल्ल्यानंतर भारतीयांकडून संताप व्यक्त होत असून सरकारने या हल्ल्याचा बदला घेण्याची भावना व्यक्त होत असून भारत-पाकमधील तणाव वाढला आहे. अशात युद्धाची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने अनेक राज्यांना ७ मे रोजी बुधवारी, मॉक ड्रिल (Mock drill) करण्याचं सांगितलं आहे. या मॉक ड्रिलचा उद्देश असा आहे, की जर युद्ध किंवा अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर आपल्या देशातील नागरिकांना कशाप्रकारे वाचवता येईल.

या मॉक ड्रिलमध्ये लोकांना जागरुक केलं जाईल, की हवाई हल्ल्याच्या वेळी काय करायचं. ब्लॅकआउट किंवा इतर परिस्थितीत कोणती पावलं उचलावीत आणि स्वतःचं संरक्षण कसं करावं याबद्दल लोकांना मॉक ड्रिलद्वारे माहिती दिली जाईल. नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हे मॉक ड्रिल (Mock drill) ७ मे रोजी घेण्यात यावं असे आदेश देण्यात आले आहेत.

गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्या बाबतीत मंत्रालयाने त्यांच्या सूचनांमध्ये पाच मुद्द्यांवर भर दिला आहे.

हे पाच मुद्दे महत्त्वाचे –

  • हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवणे
  • नागरिकांना/विद्यार्थ्यांना नागरी संरक्षण प्रशिक्षण
  • ब्लॅकआउट म्हणजे वीज बंद करणं, जेणेकरून शत्रू टार्गेट पाहू शकणार नाही.
  • हल्ला होत असताना स्थापनांमध्ये लपण्यासाठी उपाययोजना करणं
  • लोकांसाठी निर्वासन योजना तयार करा आणि त्याचा अभ्यास करा

यापूर्वी, पंजाबच्या फिरोजपूर कॅन्टोन्मेंट बोर्डाने रविवारी रात्री ३० मिनिटांचा ब्लॅकआउट रिहर्सल आयोजित केला होता, ज्यामध्ये ब्लॅकआउट झाल्यास काय करावं याबद्दल माहिती देण्यात आली होती. पहलगाम हल्ल्याचा संबंध पाकिस्तानशी असल्याने, भारत पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला प्रतिसादात पर्यायांचा विचार करत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उच्च संरक्षण अधिकाऱ्यांसह अनेक उच्चस्तरीय बैठका घेत आहेत.

पाकिस्तानने पहलगाममध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी हल्ल्यातील गुन्हेगारांचा आणि कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनांपेक्षा जास्त कठोर शिक्षा मिळेल असं म्हणत या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचं सांगितलं. त्यानंतर आता मॉक ड्रिक घेण्याचं राज्यांना सांगण्यात आल्याने युद्ध अटळ असल्याचं चित्र आहे.