शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर हे गुजरात टायटन्सकडून मोठ्या प्रमाणावर धावा करीत आहेत. त्याचवेळी मुंबई इंडियन्सचा अव्वल फलंदाज रोहित शर्माला सूर गवसल्यामुळे त्यांनीही सातत्याने द्विशतकी धावा करण्यास सुरुवात केली आहे. या परिस्थितीत प्रतिस्पर्ध्यात आज, मंगळवारी होणाऱ्या सामन्यांत आघाडीच्या फलंदाजांकडून होणारा धाववर्षावच सामन्याचा निर्णय निश्चित करू शकेल. मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या अहमदाबाद येथील सामन्यात हार पत्करावी लागली होती. मात्र आता चित्र बदलले आहे. रोहित शर्माला सूर गवसल्यामुळे ‘मुंबई’च्या फलंदाजीची ताकद जास्त वाढली आहे.
आयपीएलमधील एकूणच कामगिरी लक्षात घेतल्यास सलामीच्या फलंदाजांची कामगिरी खूपच मोलाची ठरते. आमची फलंदाजी लक्षात घेतल्यास चांगली सुरुवात आमच्यासाठी जास्त आवश्यक आहे. रोहित शर्माकडून फारशा धावा झाल्या नाहीत तरी तो वेगवान सुरुवात करून देत असल्याचा चांगला परिणाम होत असे. आता तो मोठी खेळी करीत आहे. त्याला रायन रिकल्टनची चांगली साथ लाभत आहे, त्यामुळे फलंदाजीत अपेक्षेनुसार घडत आहे, असे जयवर्धने यांनी नमूद केले.
साई सुदर्शन, शुभमन गिल आणि जोस बटलर यांच्यावर ‘गुजरात’च्या फलंदाजीची मदार आहे. त्यांना रोखणे ‘मुंबई’साठी आज मोलाचे असेल, असेच जयवर्धने यांनी सांगितले. ‘गुजरात टायटन्सचे सलामीवीरच नव्हे तर त्यांच्या तीन फलंदाजांनी संघाच्या ७५ टक्के धावा केल्या आहेत. तेच प्रामुख्याने संघाच्या डावातील जास्तीत जास्त चेंडू खेळत आहेत. त्यामुळे आम्हाला त्यादृष्टीने नक्कीच विचार करावा लागणार आहे’, असे ते म्हणाले. तिघा अव्वल फलंदाज धावा करीत आहेत. त्यामुळे मधल्या फळीस जास्त संधी मिळत नाही यामुळे आम्ही चिंता करण्याचे काहीच कारण नाही. वेळ आली तर तेही मोठी धावसंख्या रचतील असा विश्वास असल्याचे गुजरात टायटन्स (GT) संघाचे क्रिकेट संचालक विक्रम सोळंकी यांनी सांगितले.
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स ही लढत द्विशतकी धावा रचण्यात आलेल्या खेळपट्टीवर होणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईत दोन दिवस वादळी पावसाची शक्यता आहे. तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा इशारा देण्यात आला आहे. अॅक्यूव्हेदरनुसार संध्याकाळी पाच वाजता जोरदार सरी अपेक्षित आहेत. सामन्याच्या कालावधीत खूपच ढगाळ वातावरण असेल. दरम्यान, पावसाची शक्यता लक्षात घेऊन सोमवारी प्रतिस्पर्धी संघाचा सराव सुरू असताना खेळपट्टी आच्छादित करण्यात आली होती.