आरक्षण घेणारच त्याशिवाय माघारी नाही, मनोज जरांगे पाटलांची घोषणा

मुंबईत २० जानेवारीपासून आमरण उपोषणाची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यामुळे आता मुंबईत नेमकं कसं यायचं? मार्ग काय? याचा प्लॅन काय हेच मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय. तब्बल ३ कोटी मराठे मुंबईत येतील असा दावा करत आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कात उपोषण करू असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. अंतरवाली सराटीपासून मुंबईकडे जाण्याचा मार्ग निश्चित होणार आहे. मिळेल त्या वाहनाने या, आंदोलन काळात पुरतील तेवढ्या वस्तू सोबत ठेवा, असं आवाहन करत सोबत काय काय घ्यायचं हे सांगितले जाईल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. जरांगे पाटील यांनी तीनदा आतापर्यंत उपोषण केलं. पहिल्यांदा पोलिसांचा लाठीचार्ज झाला. त्यानंतर सरकारने दोनदा शिष्टमंडळ पाठवून मुदत घेतली. आता २४ डिसेंबरचा अल्टिमेटम संपलाय. त्यामुळं मुंबईत शेवटचं आंदोलन असेल असंही जरांगे पाटील म्हणाले.