IPL फायनल अहमदाबादलाच, BCCIने पावसाबाबत घेतलाय मोठा निर्णय

यंदाच्या आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी ३ जून रोजी अहमदाबाद येथे रंगणार असून येथेच स्पर्धेची दुसरी क्वालिफायरही होईल. मुल्लानपूर येथे प्ले-ऑफ मालिकेतील दोन सामने होतील, अशी माहिती बीसीसीआयने मंगळवारी पत्रकाद्वारे दिली. दक्षिण भारतातील लहरी हवामानामुळे आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या व्यवस्थापनाने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ही बेंगळुरूला होणारी लढत लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर होईल. तसेच ‘बेंगळुरू’चा लखनऊ सुपर जायन्ट्सविरुद्धचा सामनाही (२७ मे) पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे लखनऊ येथे रंगणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघ ‘बेंगळुरू’विरुद्धच्या सामन्यासाठी मंगळवारी बेंगळुरूला रवाना होणार होता; पण आयपीएल संघव्यवस्थापनाने त्यांना लखनऊलाच थांबण्याचे आदेश दिले. हवामान खात्याने बेंगळुरूला गुरुवारपर्यंत ‘यलो अॅलर्ट’ही दिला आहे. पावसामुळे सामन्यांवर परिणाम होऊ नये; यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय़ घेण्यात आला. गेल्या शुक्रवारी ‘बेंगळुरू’ संघाची चिन्नास्वामी स्टेडियमवरील कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धची लढत पावसामुळे वाया गेली होती. शहरात पाऊस आणि विजांचा जोर कायम असल्याने ‘बेंगळुरू’ संघाचे खेळाडूही हॉटेलातच अडकून पडले आहेत. शहरात पावसामुळे सखोल भागात पाणीही भरले आहे.

मंगळवारी दुपारी ‘बेंगळुरू’ संघाचे पर्यायी सरावसत्र होते. त्यावेळी या बदलाची माहिती खेळाडूंना देण्यात आली. ‘कोलकाता’विरुद्धच्या सामन्याच्या आदल्यादिवशी ‘बेंगळुरू’ संघाने सराव केला होता. त्यानंतर मंगळवारी त्यांना हलका सराव करता आला. मंगळवारी रात्रीही बेंगळुरूत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. सामने लखनऊला हलवण्यात आल्यामुळे आता ‘बेंगळुरू’ संघास उर्वरित लढती जिंकून साखळी लढतींच्या अखेरीस अव्वल क्रमांकावर झेप घेता येईल.