छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीसाठी तब्बल ५९३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून पणदरे व बारामती (Baramati) गटातून सर्वाधिक ७९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे ब वर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
सहकारातील अग्रेसर कारखाना असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. यामुळे बारामती येथील प्रशासकीय भवन गर्दीने फुलून गेले होते. कारखान्याच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, विरोधी गट असलेल्या माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरु-शिष्यांची जोडीच्या गटाने तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कष्टकरी शेतकरी संघर्ष समिती व काही अपक्षांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
अर्ज स्वीकारण्याच्या आज शेवटच्या दिवशी माळेगाव (५२ ), पणदरे ( ७९), सांगवी (५४), खांडज – शिरवली (६६), निरावागज ( ५९), बारामती (७९), महिला राखीव (६८), अनुसूचित जाती जमाती (२०), भटक्या जमाती(६४), इतर मागासवर्ग (२५), ब वर्ग सहकारी उत्पादक,बिगर उत्पादक संस्था व पणन (२८) अशा ५९३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान उमेदवारी अर्जांची आज छानणी होणार असून २९ मे ते १३ जून २०२५ पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा कालावधी आहे. याच दिवशी दुपारी अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, साखर कारखान्याच्या निवडणुकीत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार उतरल्यामुळे या निवडणुकीची रंगत वाढणार आहे. अजित पवार आपली उमेदवारी कायम ठेवतात की माघार घेतात, हे येणाऱ्या काही दिवसात दिसून येईल.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वाखालील ‘श्री जय भवानी माता’ पॅनलने दणदणीत विजय मिळवला. अजित पवार व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची युती झाल्यामुळे निवडणूक एकतर्फी झाली. सभासदांनी पवार -जाचक यांच्या युतीच्या पॅनेलवर विश्वास दाखवत श्री जय भवानीमाता पॅनेलकडे एकहाती सत्ता दिली.
