भारताचा दुसरा अंतराळवीर होण्याच्या दृष्टीने शुभांशु शुक्ला (Shubanshu Shukla) यांची ऐतिहासिक झेप काही काळासाठी लांबणीवर पडली आहे. बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता ते एक्सिओम-४ मोहिमेद्वारे अंतराळात झेप घेणार होते, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे हे उड्डाण पुढे ढकलण्यात आलं. अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळ मोहिमेवर जाणारे दुसरे भारतीय बनून इतिहास रचणार आहेत. पण भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? चला आज शुभांशु शुक्ला यांच्या निमित्ताने जाणून घेऊयात भारताने पहिल्या अंतराळवीरासाठी किती खर्च केला होता?
शुभांशु शुक्ला यांच्यापूर्वी भारताच्या अंतराळ प्रवासात राकेश शर्मा यांचं नाव आजही सुवर्णाक्षरात लिहिलं जातं. मूळचे पंजाबच्या पटियालाचे शर्मा हे 1984 मध्ये भारत-सोविएत अंतराळ मोहिमेद्वारे ‘सोयुज टी-11’ या यानातून अंतराळात गेले होते. त्यांनी जवळपास 8 दिवस अंतराळात घालवले. विशेष म्हणजे त्यांच्या मोहिमेसाठी भारताने कोणताही आर्थिक खर्च केला नव्हता. संपूर्ण मोहिमेचा खर्च सोविएत युनियनने उचलला होता.
या तुलनेत, शुभांशु शुक्ला यांच्या एक्सिओम-4 मिशनवर भारत सरकारने जवळपास 548 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. यात शुभांशु यांच्यासह त्यांच्या बॅकअप अंतराळवीर ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर यांची ट्रेनिंग, वैद्यकीय चाचण्या आणि लॉजिस्टिक तयारी यांचा समावेश आहे.
राकेश शर्मा यांचा प्रवास फक्त वैज्ञानिक नाही तर सांस्कृतिकदृष्ट्याही ऐतिहासिक ठरला. त्यांनी अंतराळात इंदिरा गांधी, तत्कालीन संरक्षणमंत्री वेंकटरामन आणि राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग यांचे फोटो नेले होते. पंतप्रधान इंदिरा गांधींशी थेट संवादादरम्यान, “अंतराळातून भारत कसा दिसतो?” असा प्रश्न विचारला असता, त्यांनी अतिशय भावनिक उत्तर दिलं – “सारे जहाँ से अच्छा.”अंतराळातील गुरुत्वशून्यता असताना राकेश शर्मा यांनी योगाभ्यासही केला होता.हा एक अनोखा प्रयोग जो आजही चर्चेत असतो.