पॉलिटेक्निकच्या प्रवेशाला सुरुवात; ९ जुलैला गुणवत्ता यादी

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून राबवल्या जाणाऱ्या तंत्रनिकेतन पदविका (पॉलिटेक्निक डिप्लोमा) अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण केलेल्या किंवा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश घेण्यासाठी दोन जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. त्यानंतर कच्ची गुणवत्ता यादी चार जुलैला जाहीर होणार असून अंतिम गुणवत्ता यादी ९ जुलैला जाहीर होईल. विद्यार्थी https://dsd25.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करू शकतील.

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना किंवा आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्यांना पॉलिटेक्निकच्या (Polytechnic) थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेता येतो. पॉलिटेक्निक संस्थांमध्ये प्रवेश क्षमतेच्या १० टक्के जागा थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी राखीव असतात. गेल्या वर्षी २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निकच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला होता. विद्याथ्यांनी संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करायचे आहेत. महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थी केवळ संस्था स्तरावर होणाऱ्या शेवटच्या समुपदेशन फेरीसाठी पात्र असतील.

यंदा खुल्या गटासाठी ४०० रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी ३०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत आहे. राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खासगी पॉलिटेक्निक संस्थांत या प्रक्रियेसाठी अर्जसुविधा केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत याठिकाणी मोफत अर्ज भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. विद्याथ्यांनी आपली मूळ प्रमाणपत्रे याच कालावधीत त्याठिकाणी पडताळणी करून घ्यावयाची आहेत.

विद्यार्थ्यांना २ जुलैअखेर हे अर्ज सादर करण्याची मुदत आहे. प्रवेशाची कच्ची गुणवत्ता यादी ४ जुलैला जाहीर होईल. त्यानंतर पाच ते सात जुलै या काळात हरकती किंवा तक्रारी नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. ९ जुलैला पक्की यादी लागेल. त्यानंतर पसंतीक्रम भरण्याच्या फेऱ्या होणार आहेत. त्याचे सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर होणार आहे.