उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हिंजवडीबाबत प्रशासनाला सूचना

‘हिंजवडीत किती पाऊस पडतो, किती पाणी येते, कोणते ओढे बुजवले आहेत, याची माहिती घेतली जात असून, ओढ्यांवर बांधलेल्या इमारती पाडण्याचा आदेश प्रशासनाला दिला आहे. बुजवलेले सर्व ओढे नदीपर्यंत प्रवाहित केले जातील,’ अशी माहिती पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी पत्रकारांना दिली. ‘गेल्या महिन्यात हिंजवडीत पूर परिस्थिती निर्माण होऊन हाहाकार माजला. तशी परिस्थिती आता ओढवणार नाही,’ अशी ग्वाहीच त्यांनी दिली.

मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे हिंजवडीत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. प्रमुख रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्याने अनेक वाहने अडकून पडली होती. स्थानिकांना आणि आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांना याचा फटका बसल्यानंतर अजित पवार यांनी मागील आठवड्यात हिंजवडीची पाहणी करून सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या बैठकीत पवार यांनी ओढ्यावर बांधलेल्या इमारती पाडण्याचा आदेश दिला.

‘मागील रविवारी अधिकाऱ्यांसह हिंजवडीची पाहणी केली. जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि औद्योगिक महामंडळ यांच्याकडे सर्वेक्षणाची जबाबदारी दिली होती. त्यानुसार काम सुरू झाले असून, अनधिकृत बांधकामे हटवली जात आहेत. हिंजवडीत किती पाऊस पडतो, किती पाणी येते, कोणते ओढे बुजवले आहेत, याबाबत सर्वेक्षण सुरू आहे. ओढ्यांवर बांधलेल्या इमारती पाडण्याचे आदेश दिले आहेत. या इमारती फार मोठ्या असतील, तर मार्ग काढून ओढे नदीपर्यंत प्रवाहित केले जातील,’ असे पवार यांनी सांगितले.

‘लक्ष्मी चौक ते उड्डाणपूल, घोटवडे- माण- हिंजवडी- मारुंजी- कासारसाई, पाषाण- सूस- पिरंगुट, म्हाळुंगे- घोटवडे या रस्त्यांची कामे करण्याची सूचना दिली आहे. ओढ्यात भाजी मंडईसारखे आरक्षण दाखविण्याच्या चुका ग्रामपंचायतींनी केल्या आहेत. ग्रामपंचायतींना सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी जागा देण्याची सूचना प्रशासनाला केली आहे,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील धोकादायक पुलासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची समिती नेमली होती. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधिमंडळात समितीची घोषणा केल्याने सचिवांच्या या समितीला अधिक महत्त्व आहे. जिल्हाधिकारी सर्व माहिती या समितीला देतील. त्यानंतर सचिव निर्णय घेतील. मात्र, धोकादायक आणि वापरासाठी योग्य नसलेले पूल पाडायला सांगितले आहे. -अजित पवार, उपमुख्यमंत्री