भारतात Weight Loss साठी शस्त्रक्रियांऐवजी औषधांना पसंती

धावपळीचं आयुष्य, बदलेल्या खाण्यापिण्याच्या सवयी, लाईफस्टाइल यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढल्याचं दिसतंय. त्यामुळे भारतात वेट लॉसचा ट्रेण्ड आलेला दिसून येतो. झिरो फिगरच्या मागे पळणारेही यात सहभागी होतायत. दरम्यान भारतात लठ्ठपणा कमी करण्यासाठी औषधांचा वापर वाढताना दिसतोय. शस्त्रक्रियांऐवजी आता अनेकजण औषधांद्वारे वजन नियंत्रणाचा पर्याय निवडत आहेत. मात्र, या औषधांचा खर्च आणि दुष्परिणाम यामुळे अनेकांना उपचार अर्धवट सोडावे लागत आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

वाढता लठ्ठपणासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने महत्वाची माहिती दिली आहे. भारतात सुमारे 23% नागरिक लठ्ठपणाचा सामना करत आहेत. यात महिलांचे प्रमाण 24%, तर पुरुषांचे 22.9% आहे. गेल्या दोन दशकांत लठ्ठपणावरील शस्त्रक्रिया वाढल्या असल्या, तरी आता औषधांद्वारे वजन कमी करण्याकडे कल वाढला आहे विशेषतः तिशीतील तरुणांमध्ये हा कल अधिक दिसत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.

वजन कमी करण्याच्या औषधांचा मासिक खर्च 12 हजार ते 15 हजार रुपये इतका येतो. जो सामान्य नागरिकांना परवडणारा नाही. याउलट बारियाट्रिक शस्त्रक्रियेसाठी 3 ते 5 लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे अनेकजण शस्त्रक्रियेऐवजी औषधांचा पर्याय निवडतात, असंही अहवालातून समोर आलंय. या औषधांचा वापर करताना मळमळ, उलटी, जुलाब, पोटदुखी आणि गॅस यांसारखे दुष्परिणाम जाणवतात. काही प्रकरणांत डोळ्यांची तपासणीही आवश्यक ठरते. यामुळे नियमित वैद्यकीय देखरेख गरजेची असल्याचा सल्ला डॉक्टर देतात.

डेन्मार्क आणि व्हिएन्नाच्या अभ्यासानुसार, या औषधांचा वापर करणाऱ्यांपैकी सुमारे 50% रुग्ण एका वर्षात उपचार सोडतात. यामागे खर्च आणि दुष्परिणाम ही प्रमुख कारणे आहेत. पण याचा रुग्णाच्या शरीरावर परिणाम होत असल्याचेही दिसून आले आहे. वजन कमी करण्याचा ट्रेण्ड, त्यासाठी शस्त्रक्रिया, औषधोपचाराचा वाढता वापर याबद्दल आपण माहिती घेतली. पण मग वजन कमी कसं करायचं ? असा प्रश्न अनेकांना पडतो. औषधांबरोबरच संतुलित आहार आणि नियमित व्यायाम केल्यास वजन कमी होण्याचा वेग वाढतो. तज्ज्ञांचा सल्ला आणि वैद्यकीय देखरेख यामुळे उपचार यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते, असे डॉक्टर सांगतात.