मुंबईकरांच्या प्रकृतीला मोठा धोका, हवा बिघडली; AQI किती?

सध्या दिवाळीनिमित्त सर्वत्रच फटाक्यांची आतेषबाजी पाहायला मिळत आहे. आता याच फटाक्यांमुळे मुंबईला वायू प्रदूषणाचा विळखा बसल्याचे दिसत आहे. मुंबई शहरात सध्या धूरकट वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या मुंबईतील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली असून याचा थेट परिणाम दृश्यमानतेवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. मुंबई शहरातील मुख्य महामार्गांवर दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तसेच यामुळे नागरिकांना गंभीर आजार होण्याची शक्यता आहे.

मुंबईत शहरभर पसरलेल्या प्रदूषणाने मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १३३ वर पोहोचला आहे, जो ‘मध्यम’ श्रेणीत येतो. मात्र, एक्यूआय संकेतस्थळाच्या माहितीनुसार, संपूर्ण मुंबईतील सर्वच प्रमुख ठिकाणची हवा नागरिकांच्या आरोग्यास घातक कॅटेगरीमध्ये आहे. याचा अर्थ शहरातील बहुतांश लोक दूषित हवेत श्वास घेत आहेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, मुंबईतील काही भागांमध्ये प्रदूषणाने गंभीर पातळी गाठली आहे. सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे भायखळा येथे AQI २१३ नोंदवला गेला, जो ‘गंभीर’ हवेची गुणवत्ता दर्शवितो. यानंतर सिद्धार्थ नगर-वरळी येथे २०४, वांद्रे हिल रोडवर १९१, चेंबूर १८७ आणि देवनार येथे १८७ अशी उच्च पातळीची नोंद आहे. यामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये हवा अत्यंत दूषित झाली आहे. मंगळवारी सकाळी या भागात दाट धुके आणि कमी दृश्यमानता स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

या वाढत्या प्रदूषणामागे अनेक कारणे आहेत. सध्या शहरात हिवाळ्याची सुरुवात झाली आहे. यामुळे वाऱ्याचा वेग मंदावला आहे. या काळात प्रदूषकांचे कण हवेत स्थिर राहून ते विरघळून जात नाहीत. तसेच शहरात मोठ्या प्रमाणातील बांधकामे आणि वाढलेल्या वाहतुकीमुळे होणारे धुळीचे आणि धुराचे उत्सर्जन या प्रदूषणात भर घालत आहे. दिवाळीनंतर फटाक्यांच्या धुरामुळेही हवेची गुणवत्ता काही दिवस खालावली होती.