राज्यातील सर्वात मोठा आका देवेंद्र फडणवीस असून ते गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. राज्यात ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, फलटण युवती डाॅक्टर आत्महत्या, रणजितसिंह निंबाळकर क्लीन चिट, पवईमधील अपहरण कांड, तसेच गडचिरोलीमधील उत्खणन मुद्यावरून सपकाळ यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप करताना राज्याला पूर्णवेळ गृहमंत्र्याची मागणी पक्षाकडून असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “राज्यातील सर्वात मोठा आका देवेंद्र फडणवीस आहेत. ते गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचे काम करत आहेत. गडचिरोलीमधील उत्खणनामधून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारीचा आका सुद्धा देवेंद्र फडणवीस आहेत. सपकाळ यांनी फडणवीस यांनी फलटणमध्ये निंबाळकरांना दिलेल्या क्लीन चिटवरूनही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, फडणवीस फलटणला जातात आणि रणजितसिंह निंबाळकर यांना क्लीन चिट देतात.
हर्षवर्धन सपकाळ यांनी पवई अपहरणकांडवरूनही संशय व्यक्त केला. ते म्हणाले त्या अपहरण कांडमध्ये नेमकं काय झालं? ठेकेदारांची सुद्धा छळ होत आहे. पैसे मिळत नाहीत म्हणून आर्याने चुकीचा कृत्य केलं, त्याचे समर्थन होऊ शकत नाही. मात्र, महाराष्ट्र पोलिसांना गोळी कोणी चालवायला तर नाही सांगितली? कारण पुढे त्याने काही बोलू नये, त्याचे फोटो अनेकांसोबत होते.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला पूर्णवेळ गृह मंत्री नसल्याने आणि ते (फडणवीस) आकासारखे वावरत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण झाला आहे. पूर्णवेळ गृहमंत्री मिळावा अशी काँग्रेस पक्षाची मागणी असल्याचे ते म्हणाले.
सपकाळ यांनी फलटणमधील आत्महत्या प्रकरणावरूनही सपकाळ यांनी सरकारवर सडकून प्रहार केला. ते म्हणाले की, ती आत्महत्या म्हणायची का? याल संपूर्ण सरकार जबाबदार आहे. फटलणचे आकाला विशेष सुविधा महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. फडणवीस पुरस्कृत घटना तिथं होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
