देशात जिथे थंडी पूर्णपणे संपण्याच्या उंबरठ्यावर आहे, तिथे आता उत्तर भारतासह इतर ११ राज्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस त्रासदायक ठरणार आहे. हवामान विभागाने २४ तासांनंतर 11 राज्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या पावसामुळे तापमानातही घट होईल. हवामान बिघडल्याने लोकांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे. तसेच, डोंगराळ राज्यांसाठीही IMD ने नवीन अपडेट जारी केले आहे. फिरायला जाण्यापूर्वी एकदा येथील हवामान अपडेट नक्की वाचा. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या अनेक भागांमध्ये पुढील ३ दिवसांत २ ते ३ अंश सेल्सियस तापमानवाढ होण्याची शक्यता आहे. तर चला जाणून घेऊया देशातील इतर राज्यांच्या जिल्ह्यांमध्ये हवामान कसे राहील…
राज्यात कसे असणार हवामान
राज्यात फेब्रुवारी महिन्यात गारवा असतो. पण हा गारवा कमी होऊन तापमानाचा पारा चांगलाच चढणार आहे. मात्र, आज संपूर्ण दिवस कोरडे वातावरण असणार आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने सू्र्यप्रकाशित हवामान राहण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि गोव्यामधील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण तसेच दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच संपूर्ण आठवडा उत्तर कोकण, दक्षिण कोकण, गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, गुजरात प्रदेश, सौराष्ट्र कच्छ येथे वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे.
देशातील या 11 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागानुसार देशातील 11 राज्यांमध्ये पाऊस चिंता वाढवणारा ठरणार आहे. IMD ने ज्या राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे त्यामध्ये पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान-निकोबार द्वीपसमूह यांचा समावेश आहे. या काळात काही भागांमध्ये ३० ते ४० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये १६ फेब्रुवारी आणि १७ फेब्रुवारी रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
