आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत अंतिम सामन्याआधीचा सर्वात मोठा सामना हा रविवारी 15 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान भिडणार आहेत. उभयसंघातील हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट सुपर 8 मध्ये पोहचणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना प्रतिष्ठेचा आणि महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य आहेत. दोन्ही संघांनी खेळलेले 2 सामने जिंकलेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांकडे सलग तिसरा विजय मिळवून सुपर 8 मध्ये धडक देण्याची संधी आहे. मात्र कोणता संघ सलग तिसरा सामना जिंकण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडिया बदल फिक्स, संजू सॅमसनला डच्चू
या महत्त्वाच्या सामन्यानासाठी टीम इंडियात 1 बदल होणार असल्याचं निश्चित आहे. टीम इंडियात ओपनर अभिषेक शर्मा याचं कमबॅक होणार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषेदत याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे अभिषेकला संधी मिळाल्यास संजू सॅमसन याला डच्चू मिळणार हे निश्चित झालं आहे.
अभिषेक शर्मा याला वर्ल्ड कप मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यानंतर पोटाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर अभिषेकला डिस्चार्ज देण्यात आला. अभिषेकला आजारामुळे नामिबिया विरूद्धच्या सामन्याला मुकावं लागलेलं. तसेच अभिषेक 2 सामन्यांत खेळणार नसल्याने संकेत कॅप्टन सूर्याने नामिबिया विरुद्ध टॉसनंतर दिले होते. त्यामुळे चाहत्यांनी चिंता वाढली होती. मात्र सूर्यानेच पाकिस्तान विरुद्ध सामन्याआधी अभिषेक खेळणार असल्याचं सांगून चाहत्यांना मोठा दिलासा दिला आहे.
नामिबिया विरुद्ध संजूला संधी
दरम्यान अभिषेक नामिबिया विरूद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याने टीम मॅनेजमेंटने संजू सॅमसन याला संधी दिली होती. संजूने विस्फोटक खेळी करत भारताला वेगवान सुरुवात मिळवून दिली होती. मात्र संजू फटकेबाजीच्या प्रयत्नात आऊट झाला. संजूने नामिबिया विरुद्ध 8 बॉलमध्ये 275 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने 22 धावा केल्या होत्या. संजूने या खेळीत 3 षटकार आणि 1 चौकार लगावला होता. आता अभिषेकच्या कमबॅकमुळे संजूला उर्वरित स्पर्धेत संधी मिळेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन/अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
