रश्मिकाशी साखरपुडा करण्याबाबत अखेर विजय देवरकोंडाने……

अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना या जोडीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. या दोघांनी काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. त्यानंतर त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री सुपरहिट ठरू लागली. विजय आणि रश्मिका एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून आहे. लवकरच हे दोघं साखरपुडा करणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

या साखरपुड्याच्या चर्चांवर आता विजयने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने रश्मिकासोबत साखरपुडा करणार की नाही, या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.विजयने या मुलाखतीत साखरपुड्याच्या चर्चांना फेटाळलं आहे. “मी फेब्रुवारीमध्ये लग्न किंवा साखरपुडा करत नाहीये”, असं त्याने स्पष्ट केलं.

याविषयी तो पुढे म्हणाला, “मला आता असं वाटू लागलंय की पत्रकारांना दर दोन वर्षांनी माझं लग्न लावायचं असतं. प्रत्येक वर्षी मी या अफवा ऐकतो. ते फक्त माझ्या मागे लागले आहेत की कधी मी त्यांच्या तावडीत सापडतो आणि कधी माझं लग्न होतं.” विजयच्या या उत्तरामुळे साखरपुड्याच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

आतापर्यंत रश्मिका आणि विजयने कधीच जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली नाही. मात्र त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री आणि सोशल मीडियावरील काही गोष्टींच्या निरीक्षणानंतर चाहत्यांनी दोघांच्या अफेअरची शक्यता व्यक्त केली. इतकंच नव्हे तर रश्मिका आणि विजय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचंही म्हटलं गेलं होतं.