भगवं वादळ मुंबईच्या दिशेने…

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. लाखो मराठ्यांच्या साथीने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने कूच केले आहे. तर आज अंतरवाली सराटीतून निघालेला मोर्चा येत्या २६ जानेवारी रोजी मुंबईत धडकणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह हे मराठे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. दरम्यान, राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपर्यंतची मुदत दिली होती. 20 जानेवारीपर्यंत सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी जरांगे पाटील यांची मागणी होती. मात्र सरकारने ही मागणी पूर्ण केली नसल्याने मनोज जरांगे मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. आज सकाळीच जरांगे पाटील जालन्यातील अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेला रवाना झाले. तर मुंबईला रवाना होण्यापूर्वी जरांगे भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले.