लोकसभा निवडणूक कधी आणि किती टप्प्यांत होणार?

लोकसभा निवडणूक जशी जवळ येईल तसे प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने जोरदार तयारीला लागले आहेत. लोकसभा आणि विधानसभेसाठी लवकरच आचारसंहिता लागू होईल. लोकसभेची निवडणूक सात टप्‍प्यांत होणार आहे.निवडणूक आयोगाकडून लवकरच आचारसंहिता जाहीर केली जाऊ शकते, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे दिली. बाजार समिती येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, लोकसभा आणि विधानसभेसाठी लवकरच आचारसंहिता लागू होईल. देशात सात टप्प्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याची आमच्यापर्यंत माहिती आहे. तीन ते चार महिने निवडणुकीत जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत.

जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस क्रमांक एकचा पक्ष बनण्यासाठी करवीर आणि हातकणंगले तालुक्यात जास्तीतजास्त निधी देऊन सदस्य संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळतात; पण, राष्ट्रवादीमुळेच त्यांचा अध्यक्ष होतो. करवीर आणि हातकणंगले तालुक्यात आपण कमी पडत आहोत.

या दोन्ही तालुक्यात जास्तीजास्त निधी दिला पाहिजे. यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावरच राहत आहे. आता राष्ट्रवादीचा अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.