बारावीचा निकाल लांबणार…..

बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत गुंतले आहे. परंतु बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षक संघटनेने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षकांच्या बहिष्कारामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यातील महत्त्वपूर्ण असणारी मुख्य नियामकांची बैठक झाली नाही. यामुळे यंदा बारावीचा निकाल जाहीर होण्यास उशीर होणार आहे.

बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिला पेपर इंग्रजी विषयाचा होता. या विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेतील मुख्य नियामकांची बैठक बहिष्कारामुळे बुधवारी झाली नाही. त्यानंतर गुरुवारी हिंदी विषयाच्या मुख्य नियामकांची बैठक झाली नाही. शुक्रवारी तोच प्रकार पुन्हा घडला.

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या वारंवार आंदोलनकरूनही मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलन केले जात आहे.कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांची सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत, यासह इतर मागण्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून आंदोलन केले जात आहे. तसेच शासन पातळीवर पाठपुरावा केला जात आहे. परंतु या मागण्या मान्य न झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे.