शेतकऱ्यांचा भाजपला थेट इशारा!

नीरा उजवा कालव्यातून दोन दिवसात पाणी द्यावे अन्यथा लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात मतदान करू असा थेट इशारा माढा लोकसभा मतदारसंघातील नऊ गावातील शेतकऱ्यांनी भाजपला दिला आहे.शेतक-यांच्या या इशा-यामुळे राजकीय वर्तुळात विशेषत: भाजपात खळबळ उडाली आहे. नीरेच्या पाण्या संदर्भात आज पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे माढा लोकसभा मतदारसंघातील सोनके, तिसंगी, पळशी, उपरी भंडीशेगाव, खेड भाळवणी यांच्या 13 गावातील शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत पाण्याच्या विषयावरुन ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

माढा मतदारसंघातील नऊ गावांना नीरा उजवा कालव्यातून तीन डी या फाट्याद्वारे शेतीसाठी पाणी दिले जाते.मात्र यावर्षी तीव्र उन्हाळा असतानाही अद्याप पाणी मिळाले नाही. त्यामुळे या भागातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.येत्या दोन दिवसात नीरेचे पाणी द्या अन्यथा भाजपा उमेदवाराच्या विरोधात मतदान करू असा निर्धार ग्रामस्थांनी केला. शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे भाजपची डोकेदुखी आणखी वाढली आहे. यावर आता पाटबंधारे विभागाचे अधिकारी काय निर्णय घेतात याकडेच लक्ष लागले आहे.