महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 17,471 पदांसाठी होत असलेल्या भरती प्रक्रियेत मोठी अपडेट समोर आली आहे. भरती प्रक्रियेत उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून आणि कोणत्याही एकाच घटकात सहभागी होता येणार आहे. त्यामुळे एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणताही एक जिल्हा निवडून पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र द्यावे, अशी सूचना गृह खात्याकडून करण्यात आली आहे.
एका जिल्ह्याची निवड करून हमीपत्र उमेदवाराने तो राहत असलेल्या जिल्ह्यात पोलिस अधीक्षक कार्यालयात द्यावे, अशी सूचना प्रशिक्षण व खास पथके विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. हमीपत्र भरण्याची अंतिम मुदत 17 मे पर्यंत आहे. त्यानंतर येणारे अर्ज बाद होणार आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी उमेदवारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी अर्ज भरल्याचे लक्षात आल्यानंतर गृह विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. एकाच पदासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केल्याने भरती प्रक्रियेनंतर काही जागा रिक्त राहत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे कोणत्याही एकाच जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 17 हजार 471 पदांसाठी भरती होत आहे. मात्र या पदांसाठी राज्यात तब्बल 17 लाख 76 हजार तरुण तरुणांकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये इंजिनिअर, डॉक्टर, बी टेक आणि एमबीए पदवी घेणारे सुद्धा असल्याने महाराष्ट्रातील भीषण बेरोजगारीचे वास्तव समोर आलं आहे.