उकाड्यानं संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra News) हैराण झाला आहे. कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होतेय. तर आता सर्वांनाच पावसाचे वेध लागलेत. रेमल वादळामुळे मान्सूनच्या (Mumbai Monsoon News) प्रवासाला वेग आला असून लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे लवकरच उन्हाच्या तडाख्यापासून लवकरच सुटका होणार हे मात्र नक्की.
येत्या 10 किंवा 11 जूनला मुंबईत पावसाची सुरुवात होणार असून 15 जूनपासून मान्सून महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, ओदिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये यंदा सरासरीपेक्षा 106 टक्के अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.एकीकडे केरळमध्ये मान्सूनची चाहूल लागली असताना महाराष्ट्रासह उत्तर भारतात उन्हाचा तडाखा जाणवतोय.
रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासाला वेग आला आहे. त्यामुळे आगामी 2-3 दिवसांत मान्सून केरळमध्ये प्रवेश करण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांची होरपळ होत आहे. हवामान खात्यानं पुढील एक ते दोन दिवस विदर्भात तापमान वाढीची शक्यता वर्तवली आहे. या काळात कमाल तापमान 44 ते 49 अंशापर्यंत वाढण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.