सोमवारी म्हणजेच 27 मे ला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदा 14 लाख 84 हजार 441 विद्यार्थी पास झाले.त्यामुळे राज्याचा निकाल 95. 81 टक्के इतका लागला. आता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहे.
मात्र महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपली मातृभाषा इतर विषयांपेक्षा अवघड जात असल्याचे चित्र आहे. कारण मराठी विषयात इंग्रजी पेक्षा जास्त विद्यार्थी नापास झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठी विषयात 38 हजार 437 विद्यार्थी नापास झाले आहेत. विशेष म्हणजे इंग्रजी भाषेपेक्षा मराठीत नापास होणार्या विद्यार्थ्यांची संख्या सहा पटीने जास्त आहे.
कारण राज्यातील केवळ 6 हजार 738 विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले आहेत. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा अवघड जात असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात एकूण 10 लाख 94 हजार 152 विद्यार्थ्यांनी मराठी या विषयाची परीक्षा दिली होती. त्यापैकी 10 लाख 55 हजार 715 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच 38 हजार 437 विद्यार्थी नापास झाले.