कोल्हापुरात महिलांनी राज्य सरकारला दाखवले ‘कोल्हापुरी चप्पल’! दिला जिल्हाबंदी करण्याचा इशारा

राज्य सरकार आणि केंद्र सरकारने देखील मराठा समाजाला फसवलं आहे, मात्र इथून पुढे मराठा समाज फसणार नाही, चार दिवसात बैठक घेऊ आणि वेळ पडली तर पालकमंत्र्यांना देखील जिल्हा बंदी करू असा इशारा कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दिल. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ‘फसवे सरकार चले जाव’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून महिलांनी केंद्र आणि राज्य सरकारला कोल्हापुरी चप्पल देखील दाखवले. मराठा समाजाला फसवणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधण्यात आल्या, तर महिलांनी काळे झेंडे दाखवले.

पीएम नरेंद्र मोदींवर टीका करण्यास सुरुवात

आरक्षणाचा मुद्दा निकालात निघत नसल्याने कोल्हापुरातील मराठा समाज देखील आता आक्रमक झाला आहे. संतापलेल्या समाजाने आता पीएम नरेंद्र मोदींवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मराठा समाजाचे आहेत आणि त्यांनी देखील मराठा समाजाला फसवल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.