या ठिकाणांवर पर्यटनास बंदी …….

गेल्या काही दिवसांपासून पावसाळ्यात अतिसाहस करणाऱ्या पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. व्हिडिओ-फोटो काढण्याच्या नादात काही जणांचे प्राण गेले. यामुळे वन विभागाने कठोर पाऊल उचलले आहे.किल्ले सिंहगड, ताम्हिणी घाट, भीमाशंकर अभयारण्य आदी ठिकाणांवर पर्यटनास बंदी केली आहे. मागील रविवारी एका पर्यटकाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. तोरणा किल्ल्यावरील एका पर्यटकाने जीव गमवला. लोणावळ्यात पाच पर्यटक वाहून गेले. यामुळे ३१ जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले आहे.

या ठिकाणी बंदी

पुणे जिल्ह्यातील वरसगाव धरण, सिंहगड, गडकिल्ले परिसर, आंबेगाव भिमाशंकर, डिंभे धरण परिसर, कोंडवळ धबधबा, माळशेज घाट, शिवनेरी, माणिकडोह, भाटघर धरण, चासकमान धरण, भोरगिरी घाट या ठिकाणी बंदी आदेश लागू असणार आहे.

कोल्हापुरात धबधब्याकडे जाणारे मार्ग बंद

कोल्हापुरातील शाहूवाडी परिसरातील धबधबे आणि धरणाजवळ पर्यटनाला बंदी घातली आहे. शाहुवाडी तालुक्यातील सर्वच धबधबे आणि पर्यटन स्थळांवर कलम 144 लागू केले आहे. भुशी डॅम दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील बरकी, केर्ले ऊखलू धबधब्याकडे जाणारे मार्ग प्रशासनाने बंद केले आहे.

अजिंठ्यात रील आणि फोटो काढण्यास बंदी

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील धबधब्याजवळ रील आणि फोटो काढण्यास बंदी
घातली आहे. अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा परिसरात रिल करण्यास बंदी केली आहे. सप्तकुंड धबधबा परिसर हा सुरक्षेच्या कारणास्तव धोकादायक असल्याने फोटो काढण्यास बंदी केली आहे. सप्तकुंड धबधबा आणि लेणी परिसरात
जीवाची बाजी लावून फोटो, रील, व्हिडिओ बनवणाऱ्यांची वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेतला.