विश्वविजेत्या Team India ला मिळालेल्या बक्षीसाचे वाटप! कोणाला किती रूपये मिळणार?

विश्वविजेत्या भारतीय संघाला बक्षीस म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) १२५ कोटी रूपये देण्याची घोषणा केली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या धरतीवर ऐतिहासिक कामगिरी करताना ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला. बीसीसीआयने बक्षीस म्हणून दिलेली रक्कम खेळाडूंसह सपोर्ट स्टाफला दिली जाईल.

याशिवाय राखीव खेळाडूंना देखील याचा लाभ होईल. तसेच विश्वचषकाच्या संघाचा भाग असलेल्या पण प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी न मिळालेल्या यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल आणि संजू सॅमसन यांनाही बक्षिसातील रक्कम दिली जाईल. त्यांना इतर खेळाडूंप्रमाणे प्रत्येकी ५ कोटी रूपये मिळणार असल्याचे कळते.

भारतीय संघाचे मावळते प्रशिक्षक राहुल द्रविड यांना १२५ कोटी रूपयांच्या बक्षिसापैकी ५ कोटी रूपये दिले जातील. याशिवाय कोचिंग स्टाफचे सदस्य असलेले विक्रम राठोड, टी दिलीप आणि प्रसाद म्हांब्रे यांना प्रत्येकी २.५ कोटी रूपये बक्षीस म्हणून दिले जातील.

बक्षिसाच्या एकूण रकमेपैकी २ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम बॅकरूम कर्मचाऱ्यांना देखील दिली जाईल, ज्यात तीन फिजिओथेरपिस्ट, तीन थ्रोडाउन स्पेशालिस्ट, दोन मालिश करणारे आणि कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई यांचा समावेश आहे.

ट्वेंटी-२० विश्वचषकात राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघाचा हिस्सा असलेले रिंकू सिंग, शुबमन गिल, आवेश खान आणि खलील अहमद यांना प्रत्येकी १ कोटी रूपये मिळतील. यासह अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवड समितील सदस्यांना देखील प्रत्येकी १-१ कोटी दिले जातील.

कोणाला किती रूपये मिळणार?

प्रत्येकी ५ कोटी – १५ खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविड

प्रत्येकी २.५ कोटी – प्रशिक्षक (फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी)

प्रत्येकी २ कोटी – फिजिओथेरपिस्ट, थ्रोडाउन स्पेशालिस्ट, मालिश करणारे आणि कंडिशनिंग

प्रत्येकी १ कोटी – निवडकर्ते आणि राखीव खेळाडू