विशाळगड दंगलीचा मास्टर माईंड कोण? जाळपोळ, हल्ले करणारे शिवभक्त कसे? जयंत पाटील यांचा सवाल

विशाळगडावरील अतिक्रमण हटावला विरोधाच्या नावाखाली गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरमधील घरांची मोडतोड व जाळपोळ करणाऱ्या सर्वांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल कराच.त्याचवेळी या कृत्याचा मास्टर माईंड शोधून कायद्याचा हिसका दाखवा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार बैठकीत केली.

निरपराध ग्रामस्थांवर हल्ले करणारे शिवभक्त असूच शकत नाहीत. समाजात या कृत्याची चीड असून दोषींना तत्काळ अटक करा, अशी मागणीही त्यांनी केली. ते म्हणाले, ”विशाळगडावर अतिक्रमण झाले आहे, काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. ती वगळून ज्यांना प्रशासनाने नोटीस दिली होती, त्यांची अतिक्रमणे असली तरी सध्याच्या मुसळधार पावसात काढणे माणुसकीला धरून नाही.

प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच ही अतिक्रमणे काढून घ्यायला पाहिजे होती. पावसाळ्यानंतर ही कारवाई केली असती तरी चालली असती. विशाळगड म्हणजे मुसळधार पावसाचे आगर आहे.