उद्या महाराष्ट्र बंदची हाक; महाविकास आघाडीकडून बंदची घोषणा….

महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात बंदची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेसने या बंदमध्ये सहभागी होण्याचे जनतेला आवाहन केले आहे. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अनेक सेवांवर त्यांचा परिणाम दिसून येईल. चाकरमान्यांना या बंदचा फटका बसू शकतो.

महाविकास आघाडीची नुकतीच बैठक झाली. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत चर्चा होणार होती. पण राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा मुद्दा मांडत जागा वाटपाची चर्चा रद्द करण्यात आली आणि शनिवारी 24 ऑगस्ट रोजी राज्यात बंदची हाक देण्यात आली. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर कामकाजावर परिणाम दिसू शकतो.

‘मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो, ज्यांना ज्यांना संवेदनशील मन आहे; त्या प्रत्येकाने हा बंद पाळला पाहिजे. नराधमांना धडा शिकवला पाहिजे.’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. हा राजकीय पक्षांचा बंद नाही. आपल्या माता-भगिनींसाठी आपण किती जागृत आहोत हे दाखवणारा बंद आहे. विकृतांच्या मनात दहशत बसवण्यासाठी हा बंद आहे. कुणीही असं दुष्कृत्य करण्यास धजावू नये आणि असं काही झालंच तर त्याला ताबडतोब शिक्षा व्हावा यासाठी हा बंद असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.